मनात काय काय येतं...
आता नाही म्हटलं, तरी तिचं आयुष्य थोडं बदललं होतं. घरी सर्व जण खूप मन मिळावू होते. नाहीतरी आधी सारखी लग्न झालं म्हणून जाच सुरू झाला असं राहीलंय तरी कुठे.. तिला कामं सुद्धा ठराविकच होती. पण तीही आळस न करता, अगदी माहेरी करायची तशी मनापासून सर्व करत होती.
मग बदल झाला तरी कसा? माणसं बदलली.. भावना अगदी माहेरच्यांसोबत होत्या तशा तर राहूच शकत नव्हत्या ना.. सध्या जॉब मिळवण्यासाठी कसरत चालुये.. असंही त्यात मन छान रमतं तिचं.. असंच एकदा ती अभ्यास चालू असताना पण अचानक आठवणीं मध्ये रमून गेली.. कारण एकतर अभ्यास थोडा जड जात असतानाच कानी एखादं बॉलिवूडचं गाणं येतं. तिला असं वाटलं आपण जे करतोय ते का करतोय आणि कुठे करतोय.. म्हणजे अचानक २६ वर्षांपूर्वीची जागा सोडून एका दुसऱ्याच जागी येऊन आपण आपलं काम घेऊन बसतो. कधी कधी यात काहीच विशेष वाटत नाही पण कधी कधी नावीन्य आणि नवल वाटून जातं.
आजच असं का वाटून जावं? कारण, ज्याच्यासाठी आपण सगळं सोडून येतो. त्याचंच आता सतत घरात असणं शक्य नव्हतं.. आणि जर सगळ्यांनाच घरा बाहेर पडायचं असेल तर कितीही जड जात असला तरी आता अभ्यास करावाच लागणार होता.
असा विचार करत असतानाच तिचं लक्ष हाता कडे गेलं, कधी कधी खूप काळजी घेतो आपण स्वतःची असं तिला जाणवलं.. आणि कधी कधी थोडं दुर्लक्ष केलं की, हाताला चरे पडल्या सारखे डाग दिसतात. हाच फरक आणि बदल असेल का स्वतः सोबत घडलेला?
घरी कुणी येणार असलं की, चालू असलेले आवडते काम सोडून पसारा आवरायला घ्यायचा.. पण पसारा तर आवरूनच ती आवडतं काम घेऊन बसली होती.. मग एवढी गडबड का होते संसारात रमल्यावर? आणि संस्कृतीच्या नावाखाली बायकांवर लादलेल्या गोष्टींचा तिला लहानपणापासूनच तिटकारा होता. त्यामुळे आता तिला अचानक फक्त लग्न झालंय म्हणून टिकली लावायचा देखील कंटाळा येऊ लागलाय. नुसतं लोकांना दाखवायचं ह्या कारणाने किती काय काय करत असतो आपण असं तिला उगीचच वाटून गेलं.
किती क्षुल्लक गोष्टी घेऊन बसली आहे मी, असा पण विचार येतो डोक्यात.. पण डोकं आणि मनच ते.. इच्छा नसतानाही आतलं सगळं वर घेऊनच येतात.. जर चांगली पोस्ट असलेला जॉब मिळाला तर बदलेल का सगळं? हवं तसं जगता येईल का? एका पुरुषप्रधान समाजात, जिथे बायकांना पण बुरसटलेलं जगणं मान्य असतं तिथे असे प्रश्न पडतच असतात कारण उत्तरं मिळणं ही खूप लांबची गोष्ट आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबडकरांनी म्हटले होते की, एखाद्या समाजाची प्रगती त्या समाजातल्या स्त्री कडे पाहून मोजता येऊ शकते.. पण आपल्या कडे मुळातच प्रगती पैशाच्या स्वरूपात मोजली जाते, तेव्हा बाईच्या आर्थिक स्वातंत्र्याला तरी कसं शुद्ध प्रगतीचे नाव देता येईल?

खुप छान👍👍
ReplyDeleteThanks Rinka..
Delete