पत्र १

माझ्या प्रिय भारतदेशा,
        तुझ्यावर करत असलेल्या प्रेमाला ही पत्र रूपी जोड़ देण्याचा आज मी प्रयत्न करतेय.
नुक़तंच रविंद्रनाथ टागोरांंनी बंगाली मध्ये लिहिलेले 'आमार देशार माती' वाचलं. अर्थात त्याचा हिंदी आणि इंग्रजी अनुवाद वाचतांंना तू जतन केलेल्या समृद्ध भाषांंचा अभिमान वाटला. फक्त भाषाच नाही, इथल्या अनेक जाती, धर्म, परंपरा, पंथ असं सारं एकत्र बांधून तू ह्या जगात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. तुझी भौगोलिक स्थितीही आपल्या वेशभूषा, अर्थशास्त्र ह्या सर्वांनांंच विविधता अंगी बाणायला लावणारी...
त्यामुळे उभ्या विश्वात स्वतःची 'भारतीय' अशी ओळख सांगताना  तुझ्यासमोर आपसूकच माथा झुकेल.. आणि तेव्हा भारतीय ह्या अस्तित्वापुढे इतर सर्व जाणिवा नगण्य वाटू लागतील..
       तुझ्या वैभवशाली इतिहासाला ह्या हृदयात एक खास जागा आहे. कधी कधी भिती वाटते हृदयाच्या ह्या खास जागेचं डोक्यातील गर्वाकडे मार्गक्रमण झालं तर? तर, ती अंधःकार घेऊन येणाऱ्या भविष्याची नांदी राहील. कारण अशा उत्तेजित करणाऱ्या गोष्टी सुरुवातीला अस्वस्थ करतात, नंतर गोंधळ माजवतात आणि शेवटी विध्वंसक आनंद देतात.. पण आता गरज आहे ती माणूसपण जपण्याची.. सोबत तत्वांची जोड़ असण्याची, आणि यातून निर्माण होणाऱ्या एकसंध भारताची.. सध्या हेच स्वप्न उराशी बाळगून असते मी. शेवटी तुझी श्रीमंती इथल्या तत्वांवरच अवलंबून आहे.. आणि हे सुद्धा तुझ्या भूतकाळाकडे बघूनच शिकायला मिळालंय.. हल्ली अशी अनेक स्वप्न मनाला कवटाळून असतात.. जी पूर्ण होण्यासाठी तुझ्यावरंच प्रेम हाच आधार वाटतो..
ह्या भूमीवर नवीन कालखंडाची पहाट व्हावी, ज्यात ज्ञान सर्वाधिक उंचीवर असेल, इथला तरुण आण्विक शक्तींंपेक्षाही शक्तिशाली अशा स्वतःच्या बौद्धिक क्षमतेने ह्या विश्वाला हादरवून टाकेल. प्रस्थापितांच्या मदतीने दिन दुबळे सक्षम बनतील, सत्ता आणि संपत्ती सोडून इतरही धोरणं खरोखर राबविली जातील, कर्तव्य देखील अधिकारांचाच भाग समजून पार पाडली जातील अशा वास्तवरूपी कल्पना केल्या तर त्यांचा अतिरेक तर होत नाहीये ना? अशी शंका भोवताली बघितल्यावर येते.
       तुझ्यागत जिद्दीने सगळं सकारात्मक पाहण्यासाठी झटायचंय.. भौतिक सुखाच्या मागे न लागता त्याच्या मागे दडलेला शेवट लवकर समजून घ्यायचाय.. सीमा प्रश्न वादात आणण्यापेक्षा त्याकडे प्रशासनाची सोय म्हणून पाहायला शिकायचंय..
माझ्या प्रिय देशा, यंदा तुझ्या पत्रकार सुपूत्राने आशियाई नोबेल म्हणवलं जाणारा 'रेमन मैगसेसे' पुरस्कार मिळवला.. अशी 'रविश' पत्रकारिता, खेळातील 'हिमा'लयीन चिकाटी, इस्त्रोचे गौरवास्पद यश इत्यादी पाहून ही सगळी क्षमता एक दिवस संपूर्ण जगाला थक्क करेल असा विश्वास वाटतो..
तुझ्या मातीतले विचारवंत संदीप वासलेकर 'नव्या युगाचा आरंभ' करूया अशी साद घालताय.. गरीब, श्रीमंत, प्रस्थापित , होतकरु असे सर्वच स्तरातील नागरिक एकत्र येऊन काम करू लागतील तेव्हा सर्वाधिक आनंद तुलाच होईल.. तुझ्या कुशीत सर्वच सुखावतात, आता वेळ आलीये आम्हा देशवासियांच्या कृतीने तू सुखावण्याची...
      तुला नेहमीच सर्व राजकीय, नैसर्गिक आप्पतींंचा सामना करावा लागतो.. नंतर उपाययोजना करण्यापेक्षा प्रतिबंध का नसतो असा यक्षप्रश्न तुला पडत असेल.. दळनवळणाच्या साधनांमुळे तुझी दोन्ही नावं- 'इंडिया' आणि 'भारत' थोड्या फार फरकाने जवळ येत आहे, म्हणजे खेड़ं आणि शहर यांच्यातील दुही कमी होतेय.. पण आजही 'खेड़यांकडे चला' जपावं की खोट्या विकासाच्या व्याख्येत,शहरांंत रमून जीवन प्रदूषणकारी करावं? अशा संभ्रमात मी असते.
तुला मनोमन आनंद झाला असेल ना जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने १३७ वर्षे जुना IPC चा कलम ३७७ काही अंशी कमी केला? हा निकाल प्रगतिशील आहे, याने सर्व काही बदलत नसलं तरी सकारात्मकता अंगी येते. इथून पुढचा बदल आमच्या हातात आहे. तुझ्या प्रेमाचे फक्त पोवाड़े गाण्यापेक्षा अपेक्षित बदल करून दाखविण्याची मनस्वी आकांक्षा आहे.
     जन्म घेतलेल्या आणि कर्म करत मला मिसळवून घेणाऱ्या ह्या मातीप्रती मी कृतज्ञ आहे. तुझ्या बद्दलचा हाच अभिमान शेवटपर्यंत प्रत्येक भारतीयाप्रती रहावा यासाठी मी सतत झटेन.
 ,  तुझीच भारतीय लेक
                                       

Comments

Popular posts from this blog

यश आणि स्वप्न

पायवाट

Dopamine